दगड, माती, लहान मोठे खडक या सर्वाना मिळून जमीन असे म्हटले जाते. ऊन, वारा, पाऊस, तापमान अशा नैसर्गिक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या प्रभावामुळे खडकांची झीज होऊन माती तयार होते. यामध्ये भौतिक, रसायनिक तसेच जैविक प्रक्रियांचा समावेश आहे. ही सातत्याने चालणारी नैसर्गिक प्रक्रिया असून सुमारे १ सेंमी जाडीचा मातीचा थर तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात.
माती अनेक कणांपासून बनलेली असते. मातीचे हे कण वेगेवेगळ्या आकाराचे असतात. आकाराने मोठ्या कणांना वाळू (sand) तर थोड्या माध्यम आकाराच्या कणांना पोयटा (silt) आणि खूप लहान किंवा सूक्ष्म अशा कणांना चिकण माती (clay) असे म्हणतात. हे सर्व प्रकारचे कण, तसेच सेंद्रिय घटक, जल आणि वायूरुपी घटक व विविध प्रकारचे अनेक सूक्ष्म जीव व काही मोठे सजीव यांचे मिश्रण म्हणजे माती. मातीची खोली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. जमिनीचा जर उभा छेद घेतला तर त्यामध्ये विविध थरांची रचना बघायला मिळते. यामध्ये सर्वात वरचा थर हा जास्त सुपीक आणि शेतीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त असतो तर सर्वात शेवटी तळाला मूळ खडक असतो. मातीत आढळणारी खनिजे या खडकातूनच येतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रदेशातील मातीचा रंग वेगवेगळा असतो. कोकणातील जमीन जांभ्या दगडापासून तयार झालेली आहे आणि विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मातीचा रंग लालसर किंवा लाल आहे.
माती हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. विविध प्रकारच्या वनस्पती तसेच पिकांच्या मुळांना आधार देण्याचे व अन्नघटक पुरवण्याचे महत्वाचे कार्य माती करते. माती हा सजीव सृष्टीचा पाय आहे. विविध वनस्पती, प्राणी तसेच आपलेही वास्तव्य जमिनीवरच अवलंबून आहे. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरज मातीमुळेच पूर्ण होऊ शकतात.
माणसाचा जमिनीवर वाढलेला वावर, शेतीच्या मशागतीच्या पद्धती आणि विविध कारणांनी केली जाणारी जमिनीची उलथापालथ यामुळे मातीचे कण विलग होऊन पाऊस व वाऱ्यामुळे दूरवर वाहून नेले जातात. या प्रक्रियेला जमिनीची धूप असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर पूर, वादळे आणि मानवाच्या विविध कृतींमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असते. कोकणामध्ये पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या लालसर मातकट रंगाच्या पाण्यातून चिकण मातीचे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात वाहून जातात. अशा जमिनीवरून विलग झालेल्या मातीच्या कणांचा प्रवास ओढे, नाले आणि नदीतून थेट समुद्रापर्यंत होतो.
जमिनीची धूप कमी करण्याच्या दृष्टीने पुढील काही उपाय योजना करता येऊ शकतात. यासाठी जमिनीचा वापर करताना विविध शास्त्रीय पद्धतींचा आधार घ्यावा लागेल आणि अवलंब करावा लागेल. जमिनीवर जोराने पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळेही जमिनीची खूप मोठ्या प्रमाणावर धूप होते. अशा ठिकाणी जमिनीवर गवताचे किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन असेल तर धूप थांबवता येते. शेतीच्या मशागतीच्या पद्धती या उताराच्या लंब दिशेत व समपातळी रेषेला समांतर करणे महत्वाचे आहे. तसेच उताराच्या जमिनीवर शास्त्रोक्त पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकरची बांध बंदिस्तीची कामे करणे. उदाहरणार्थ कोकणामध्ये डोंगराच्या उताराची तीव्रता विचारात घेऊन लहान लहान टप्यांमध्ये जमिनीचे सपाटीकरण होऊ शकते आणि तेही शास्त्रीय पद्धतीनेच आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. शिवाय डोंगर उतारावर विविध प्रकारचे वृक्ष, वनस्पती आणि वाळ्याची लागवडही करता येऊ शकते.
जगभरामध्ये दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. मातीचे महत्व सर्वाना समजावे, मातीबद्दलची जाणीव जागृती वाढावी आणि त्यायोगे मृदा संवर्धनाच्या कामात लोकसहभाग वाढावा असा यामागचा उद्देश आहे. ‘Stop Soil Erosion. Save Our Future.’ म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ‘आपल्या अस्तित्वासाठी जमिनीची धूप थांबवा.’ असा संदेश या वर्षी यानिमित्ताने देण्यात आला आहे.
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मातीबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे निश्चितच महत्त्वाचे आहे. यादृष्टीने आमचाही एक छोटासा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांना रंगवण्यासाठी मातीच्या विविध थरांचे एक चित्र तयार केले आहे. सोबत हे चित्र रंगवण्यासाठीचे मार्गदर्शनही त्यामध्ये दिलेले आहे. उपलब्ध असलेल्या रंगांतून विविध रंगछटा तयार करून विद्यार्थी हे चित्र रंगवू शकतात. चित्राची लिंक http://krishivarada.in/world-soil-day-2019/
मानवाच्या शाश्वत भविष्यासाठी शाश्वत मृदा संधारण निश्चितच महत्वाचे आहे. जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने मातीची महती आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया.